मधु मंगेश कर्णिक (एप्रिल २८, १९३१ : करूळ, (कणकवली तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा), महाराष्ट्र – हयात) हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. त्यांच्या पत्‍नीचे नाव शुभदा (माहेरचे शशी कुलकर्णी) असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. मुलगी अनुजा देशपांडे दूरदर्शनवरील एक अधिकारी आहे.

मधु मंगेश कर्णिकांचे घराणे मूळचे कोकणातील आरस या गावचे. त्यांच्या पूर्वजांनी स्वकर्तृत्वावर पेशव्यांकडून कर्णिक ही सनद मिळविली. त्यांनीच अडीचशे वर्षांपूर्वी करूळ गाव वसविले. इंग्रज सरकारने त्यांना खोती दिली. अशा या कर्णिकांच्या घरात २८ एप्रिल १९३३ या दिवशी मंगेशदादा व अन्नपूर्णाबाई यांच्या पोटी मधूचा जन्म झाला. मधु मंगेश कर्णिकांचे आई-वडील अकाली गेले. इ.स. १९५४साली त्यांचा प्रेमविवाह झाला.

मधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यात(एस्‌टीत) नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात तीन-साडेतीन वर्षे माहिती अधिकारी म्हणून, आणि नंतर मुंबई येथे सरकारच्या जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होते व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकही होते. अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, १९८३ साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले. असे असून २००६ साली ते महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष झाले.

मधु मंगेश कर्णिक यांनी एक काच कारखानाही काढला होता, पण तो त्यांना यशस्वीरीत्या चालवता आला नाही.

ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा – कृष्णाची राधा – ही रत्‍नाकर मासिकातून प्रसिद्ध झाली. तेव्हा ते मॅट्रिकच्या वर्गात होते. त्यांच्या कोल्हापुरातील वास्तव्यात खऱ्या अर्थाने कर्णिकांच्या लेखनाची सुरुवात झाली. त्यांच्या ‘लोकसत्ते’ त लिहिलेल्या कथांना प्रसिद्धी आणि मानधनही मिळाले. त्यानंतर ‘धनुर्धारी’, ‘ विविधवृत्त’ यां साप्ताहिकांमधूनही त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या.

त्यानंतर मधु मंगेश कर्णिक मुंबईला आले. ‘३४ सुंदरलाल चाळ’ हा त्यांचा पत्ता होता

त्यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली, आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या; आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले.

इ.स.१९५० ते १९६५ या काळात मधु मंगेश कर्णिकांनी खूप कथा लिहिल्या. ‘सत्यकथे’ त कथा प्रसिद्ध झाल्यापासून तर त्यांच्या अंगी एवढे बळ संचारले की, ते दर दिवाळीला पंधरावीस तरी कथा लिहू लागले.

कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वतःचे अवघे ‘गुडविल’ त्याकामी लावले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे. पंचाहत्तर लाख रुपयांचे हे देखणे संकुल आहे. महाराष्ट्रातील अवश्य भेट द्यावी अशी जी साहित्यिक-सांस्कृतिक ठिकाणे आहेत, त्यांतही मालगुंडचा नंबर वरचा लागेल. त्यामुळे गणपतीपुळ्याला आलेला प्रवासी तिथे येतोच.

अभिप्राय द्या!